नाशिकमध्ये उन्हाचा कहर :टोपी विक्रेत्यांच्या दुकानांवर नागरिकांची प्रचंड गर्दी

नाशिक,(शालिमार):- शहरातील शालिमार परिसरात(बुधवार) दि. ९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी टोपी विक्रेत्यांच्या दुकानांवर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असून, ऊन टाळण्यासाठी डोक्यावर घालण्याच्या विविध प्रकारच्या टोप्यांना मागणी वाढली आहे.
आज गुरुवारी, दुपारच्या सुमारास शालिमार परिसरात अचानक गर्दी उसळली. रोडवर उभे असणारे टोपी विक्रेते, हातगाडीवाले, व छोटे दुकानदार यांच्या दुकानांभोवती नागरिकांनी झुंबड घातली. अनेकांनी रंगीबेरंगी टोपी, गमछे, स्कार्फ यांची खरेदी करत उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
सध्या नाशिक शहरात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. ही वाढती गरमी लक्षात घेता नागरिक बाहेर पडताना डोकं झाकण्यासाठी उपाय शोधत आहेत. शालिमार हा नाशिकमधील एक प्रमुख व वर्दळीचा भाग असल्याने येथे रोज हजारोंची वर्दळ असते. मात्र, आजचं दृश्य थोडं वेगळंच होतं... जणू काही उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी लोक टोपींसाठी लढत आहेत, असं चित्र पाहायला मिळालं.
स्थानिक विक्रेत्यांनी सांगितलं की, मागील काही दिवसांत टोपींची विक्री दुपटीने वाढली असून, त्यांना सतत नवीन माल मागवावा लागत आहे. उन्हाचा जोर असाच राहिल्यास मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विक्री नक्कीच जास्त होईल, असं त्यांनी सांगितलं.