' युवकांनी व्यसनांपासून परावृत्त व्हावे ' -. पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ

नाशिकरोड :- " आज जे गुन्हेगार सापडतात त्यात युवा तरुण वयोगट १५ ते २२ असा दिसून येतो. हे युवक जेव्हा अमली पदार्थाच्या आहारी जातात. त्याची नशा शमवण्यासाठी चोऱ्या,दरोडे, लूटमार, वाहन चोरी, सुसाट वाहन पळवणे अशा गुन्ह्यांमध्ये सापडतात. याला वेळीच अटकाव व्हावा अमली पदार्थाचे सेवन हे संबंधित व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या कुटुंबालाही विनाशाकडे नेत असते. आपल्याला मिळालेले आयुष्य सन्मानाने जगा. संकटावर मात करण्यासाठी आपले आत्मबल वाढवा. चांगला अभ्यास करून आपले उज्वल करिअर घडवा. सकारात्मक विचार करा. पालकांनाही त्याबाबत समस्या सतावत आहे. शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. कुठलाही अमली पदार्थ शरीरासाठी घातक आहे. तुम्ही विद्यार्थी कुटुंबाचा व समाजाचा आधार आहात. तेव्हा कुठल्याही व्यसनांना बळी न पडता आमले पदार्थांचे सेवन करू नका, " असे मार्गदर्शन करताना उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. जयंत शिरसाठ यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सेमिनार हॉलमध्ये दि. २६ जून रोजी प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या " जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना' निमित्त ' आजचा तरुण आणि अंमली पदार्थ जनजागृती ' या प्रबोधनपर आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर श्री.जयंत शिरसाठ यांच्यासह पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे , कला शाखेचे उपप्राचार्य अनिलकुमार पठारे, डॉ. शशिकांत साबळे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन सनानसे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात २६ जून रोजी ' जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन' विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो तसेच आपल्या अवतीभोवती अनेक जण अमली पदाथाच्या विळख्यात सापडलेले दिसतात. कुठलेही व्यसन आरोग्यास हानिकारक असून मी व्यसन, अमली पदार्थाचे सेवन करणार नाही व करू देणार नाही.तसेच २६ जुन या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो असे सांगितले.
तसेच यावेळी पी आय संजीव फुलपगारे यांनीही मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनो आपण अंमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवन आयुष्य जगू अशी प्रतिज्ञा देतांना तरुण वर्ग देशाची शक्ती आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार यांनी केले तर आभार डॉ. कांचन सनानसे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ भागवत गाडेकर, डॉ. अनिल सावळे, डॉ. नागभीडे,राजेश बागुल, डॉ. सुनिता रणाते, श्री. पोरजे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.