नाशिकचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन - प्रविण तिदमे यांचा इशारा

नाशिकचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा   अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन - प्रविण तिदमे यांचा इशारा

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक गेल्या तीन दिवसांपासून पाणीच येत नसल्याने त्रस्त आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली नाशिक महानगरपालिकेकडून नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले जात असून युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी दिला आहे. 

नाशिक महापालिकेने दुरुस्तीच्या नावाखाली नाशिककरांना वेठीस धरले आहे. तीन दिवस उलटूनही पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मनपा अधिकाऱ्यांना अपयश का येत आहे ? 

दुरुस्तीच्या नावाखाली पाणी टंचाई निर्माण करायची आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नव्याने लाईन टाकाव्या लागतील असे सांगत करोडो रुपयांच्या निविदा काढायच्या, असा तर मनपा अधिकाऱ्यांचा डाव नाही ना ? असा संशय शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी व्यक्त केला आहे. 

शहरातील अनेक भागात पाणी पुरवठाच होत नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. टँकरचे पाणी विकत घेणे सर्वांना शक्य नाही आणि टँकरचे दरही मागणीमुळे वाढले आहेत. थोड्यावेळात पाणी येईल अश्या खोट्या थापा मनपा अधिकारी मारत आहेत. शहरातील नागरिकांमध्ये यामुळे संतापाची लाट असून, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी दिला आहे.